Blood Pressure: आपण पहिल्यांदा उच्च रक्तदाब / हाय ब्लडप्रेशर म्हणजे काय ते जाणून घेऊ. रक्ताचा दाब जो हृदयाकडून धमन्यांमध्ये रक्तपुरवठा करतो त्याला रक्तदाब म्हणतात. १२०/८० हा समतोल रक्तदाब गणला जातो आणिह्याच्या वर जर रक्ताचा दाब गेला तर तो उच्च रक्तदाब ठरतो जो हृदयाच्या आरोग्यास धोकादायक असतो.
मित्रानो जेव्हा दाब वाढतो तेव्हा रक्त धमन्यातून खूप फोर्सने वाहते. जे धमन्यातील टिश्यू आणि रक्त पेशींना इजा पोचवते. एखाद्या मोठ्या रोगाप्रमाणे ह्याची लक्षणे उठून दिसत नसली तरी ह्याला सायलेंट किलर म्हटले जाते कारण उच्च राक्तदाब हृदयासाठी फारच वाईट..!!काहींना तर मोठे परिणाम दिसेपर्यंत आपल्याला रक्तदाब खूप आहे हे माहितीही नसते. ही चिंतेची बाब आहे. रक्तदाबाचा त्रास आहे हे कळल्यावर, उच्च रक्तदाबावर औषधांच्या गोळ्या घ्यायला लागतात. तेही ठरलेल्या वेळेत… त्यात हयगय करून चालत नाही. जसा हा दाब वाढत जाईल तसा गोळ्यांचा डोस देखील वाढतो. २० मीग्रॅ, ४० मीग्रॅ अशा पद्धतीने. पण हा डोस खाली आणणे आपल्या हातात नक्कीच असते.. त्यासाठी लाईफस्टाईल हेल्दी ठेवणे फारच गरजेचे आहे.. रोजच्या जीवनशैलीत केलेले थोडे बदल आपल्या रक्तदाबाला नियंत्रित करू शकतात..आपण कशा पद्धतीने ह्यास सुरुवात केली पाहिजे ते पाहू:
१. शरीराची हालचाल वाढवा: तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास होऊच नये असे वाटत असेल तर व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. एकूणच स्वास्थ्यवर्धक आयुष्यासाठी शारीरिक हालचाल असणे, व्यायाम असणे आवश्यक आहे.जर बीपी ची तक्रार सुरू झाली तर व्यायामातून सुटका नाही. रोजच्या रोज किमान ३० मिनिटे चालणे, धावणे, योग, एरोबिक्स अशा प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत.ह्या शारीरिक हालचाली रक्तदाब नियंत्रित तर करतातच पण हृदयाला मजबूत करायला मदत करतात. त्याचसोबत आपले मूड स्वीन्गस, आळस, डायबेटीस ह्यापासूनही आपल्याला दूर ठेवतात.तुम्ही कधीच व्यायाम केला नसेल तर कोणा एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करा.. सुरुवातीला १५ ते २० मिनिटे करा..मात्र काही दिवसांनी ४० मिनिटांपर्यंत व्यायाम वाढवा. हृदयाची गती वाढेल असे व्यायाम नक्की करा.
२. हाय ब्लड प्रेशर कमी करू शकणारे अन्नपदार्थ खा: काही पदार्थ आपले हाय ब्लड प्रेशर कमी करू शकतात.. हे पदार्थ आपण आवर्जून खाल्ले पाहिजेत. फळे, हिरव्या पालेभाज्या, बीटरूट आणि कडधान्य हे तर रोजच्या जेवणात असतेच. ओट्स, केळी यासारखे कॅल्शिअम रिच अन्नपदार्थ, सोबत लो फॅट दुग्धजन्य पदार्थ, मासे, सुका मेवा आणि थोड्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाल्ले पाहिजेत. चार आठवडे रोज एक ग्लासभर डाळिंबाचा रस घेतल्यास उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो असे एका अभ्यासाअंती सिद्ध झालेले आहे.पण फुल फॅट दुधाचे पदार्थ, सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ, हवाबंद प्रोसेसस्ड पदार्थ टाळले पाहिजेत. तेलकट पदार्थ, गोड पदार्थ आणि कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्सचे सेवन बंद करा किंवा खूपच कमी करा. त्यापेक्षा फळांचे ताजे रस घ्या.
हेही वाचा.. सिबील स्कोअर म्हणजे काय ? तो कसा काढला जातो?
३. सोडियमचे प्रमाण अत्यल्प असले पाहिजे:शरीरात जाणारे सोडियम एकदम कमी करा. रक्त दाब नियंत्रित करण्यास हे फार गरजेचे आहे. काही माणसांना अति प्रमाणात खारट जेवण घ्यायची सवय असते. काही फळांवरही मीठ घालून खातात. ही पद्धत संपूर्ण बंद केली पाहिजे.खरे तर मीठ खाऊच नये. कारण शरीराला गरज असलेले सोडियम आणि आपण रोज खात असलेले सोडियम ह्यात खूप फरक आहे.आपल्याला १५०० मीग्रॅ इतके सोडियम खाणे योग्य आहे.. मात्र रोजच्या स्वयंपाकातून आपण त्याहीपेक्षा जास्ती मिठाचे सेवन करत असतो.त्यातून बाहेर विकत मिळणारे पॅकबंद चिप्स, नमकीन पदार्थ ह्यातून एकाच बैठकीत आपण शरीरास सोडियमचा अतिघातक पुरवठा करतो..त्यामुळे रोजच्या जेवणात पांढऱ्या मीठा ऐवजी काळे मीठ वापरलेले योग्य.. बाहेर हवाबंद पदार्थ खायच्या आधी त्यावरील लेबल नक्की वाचा. त्यातील लो सोडियम असलेले पदार्थ ते सुद्धा कमी प्रमाणात खाण्यास योग्य असतात. अशा पद्धतीने रोजच्या आहारात मीठ कमी करणे शरीराच्या स्वास्थ्यासाठी उत्तमच असते..!!
४. वजन जास्ती असल्यास वेळेत घटवा:वजन आणि रक्त दाबाचे एकमेकांशी घट्ट नाते आहे. वजन वाढत गेले की रक्तदाब वाढत जातो.. हल्ली वयाच्या तिशी चाळीशीत हार्ट अटॅक येऊन मृत्यू पावलेल्या तरुणांच्या केसेस आपण ऐकतो. त्याच्या कारणातील मुख्य कारण उच्च रक्तदाब असते. वजन आणि कोलेस्टेरॉल वाढले तर शरीरात ते घातक ठरते. वाढलेले कोलेस्टेरॉल, धमन्यांमध्ये ते साचते आणि रक्तपुरवठा शरीरास योग्य पद्धतीने होत नाही.वाढलेली चरबी शरीरातील अवयवांवर दाब देते.. दोन्ही गोष्टींची परिणीती रक्त दाब वाढण्यावर होते. त्यामुळे पोटाचा, कंबरेचा घेर नियंत्रित ठेवा. वाढते वजन वेळीच थांबवा. व्यायाम करून आणि सकस आहार घेऊन स्वतःची जीवनशैली सुदृढ करा. रोगमुक्त आयुष्य जगणे आपले कर्तव्य आहे.
५. व्यसनं कमी करा: सिगरेट / तंबाखू आणि दारू म्हणजेच उच्च रक्तदाब आणि हृदरोग कारक.. तुम्ही ह्याचे प्रमाण जितके वाढवाल तितका तुमच्या हृदयाला धोका असतो.सिगरेट आणि तंबाखूमुळे कॅन्सरचा सुद्धा धोका असतोच. त्यामुळे ह्या व्यसनातून मुक्त होता आले तर उत्तम. नाहीतर प्रमाण तरी अतिशय कमी करता आले पाहिजे.कधीतरी क्वचित थोडी वाइन किंवा मद्य शरीरास तितके घातक नाही. मात्र अतिप्रमाणात घेतल्यास उच्च रक्तदाबाला निमंत्रण देते हे नक्की.आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा परिणामदेखील हे कमी करते. त्यामुळे कोणतेही व्यसन नसलेलेच उत्तम..!!
६. तणाव कमी करा: सध्याच्या फास्ट युगात प्रत्येकाला खूप काही मिळवायचे आहे.. प्रत्येकाची धावपळ चालू आहे. कष्ट पडत आहेत आणि त्याचबरोबर मानसिक ताण तणाव सुद्धा शिगेला पोहोचत आहे.मानसिक तणाव बाह्यरूपाने दिसत नसला तरी तो शांततेत माणसाला आतून पोखरून टाकत असतो. धडधाकट माणूस तणावापायी गतत्राण होतो. पण हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी अत्यंत घातक आहे.स्ट्रेस म्हणजेच तणाव आपले ब्लड प्रेशर काही सेकंदात वाढवतो. असे सतत तणावाखाली असल्यास रक्तदाब कायम चढलेला राहतो.
हेही वाचा.. गोव्यातील दहा लोकप्रिय पर्यटन स्थळे
त्यामुळे तणाव वाढवणाऱ्या गोष्टी समजून घ्या. नोकरीतला तणाव, नात्यातला तणाव, आर्थिक तणाव ह्यापैकी काय आपल्याला छळत आहे ते शोधा. त्या गोष्टींमुळे होणारा ताण कमी करता आला तर सोन्याहून पिवळे आणि न जमल्यास तणाव वाढणाऱ्या कामांपासून, लोकांपासून दूरच रहा. नाहीतर कोणाची मदत घ्या. व्यायाम आणि सात्विक अन्न आपला तणाव खूप प्रमाणात कमी करतो. आपल्याला तणावातून बाहेर काढणारे मित्रमंडळी आजूबाजूला असुद्या.तणावातून बाहेर येण्यास छंद देखील आपली मदत करतात. योग, मेडिटेशन ची सवय ठेवा.. दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस करा.. हे सगळे तुम्हाला तणाव मुक्त नक्कीच करतील.. आणि तणावातून बाहेर आलात तर उच्च रक्तदाब छू मंतर..!!
मित्रांनो हे अत्यंत सोपे आणि साधे घरगुती उपाय तुमच्या उच्च रक्तदाबाच्या तक्रारींवर नक्कीच प्रतिबंध घालतील. कारण रक्तदाब जर दुर्लक्षित राहिला तर स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि किडण्यासुद्धा फेल होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे आहे.
तसेच डॉक्टरकडे नियमित जाऊन आपले ब्लड प्रेशर तपासून घेत रहा. त्यामुळे औषधांची मात्रा वाढली किंवा कमी झाली असल्यास तुम्हाला गरजेप्रमाणे औषध बदलता येतील
0 टिप्पण्या